Team Agrowon
महाराष्ट्रात जिऱ्याचे फारसे उत्पादन होत नसले तरी खप मात्र मोठा आहे. सध्या या जिऱ्याच्या किंमती चांगल्या तडतडल्यात.
देशातील प्रमुख बाजारांत जिऱ्याच्या दरात मोठी तेजी आलीय. गेल्या दहा दिवसांत जिऱ्याचे भाव ३६ हजार रूपये क्विंटलवरून ३९ हजार ७६५ रूपयांवर पोहोचलेत.
जिरा उत्पादनात आघाडीची राज्ये आहेत राजस्थान आणि गुजरात. तिथे अवकाळी पावसाचा जबर फटका बसल्यामुळे जिरा पिकाचं मोठं नुकसान झालंय.
राजस्थानात ७० टक्के तर गुजरातमध्ये ३० टक्के पिकाची काढणी अजून बाकी आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच या जिऱ्याची गुणवत्ताही मार खाईल.
यंदा जिऱ्याचा शिल्लक साठा कमी असल्यामुळे पुरवठ्यात मोठी तूट आहे. त्यात उत्पादन घटणार असल्यानं पुरवठा आणखीनच आक्रसून जाईल. दुसऱ्या बाजूला निर्यातीला वाढती मागणी आहे. त्यामुळे जिऱ्याच्या दराने उसळी घेतली आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन स्पाईस स्टेकहोल्डर्स (एफआयएसएस)च्या अंदाजानुसार यंदा जिऱ्याची मागणी ८५ लाख पोत्यांपेक्षा अधिक राहील; तर पुरवठा मात्र ६५ लाख पोत्यांच्या आसपास असेल. एका पोते ५५ किलोचे असते.