Team Agrowon
पिनहोल बोरर, शॉटहोल बोरर, तेल्या आणि मरसारख्या रोगांचा सततचा प्रभाव रोखण्यात शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आल्याने देशभरातील डाळिंब शेती धोक्यात आली आहे.
रोगांमुळे नव्याने डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात घट होण्याबरोबरच आता माग णी असूनही केवळ मागणीच्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा पुरवठा होऊ शकत नसल्याने निर्यातीलाही ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ५० टक्क्यांनी निर्यात घटली आहे.
जगभरातील आघाडीवरचा डाळिंब देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतात सर्वाधिक दोन लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब उत्पादन घेतले जाते.
भारताचा डाळिंबाच्या निर्यातीतला हिस्साही मोठा आहे.
जगभरातील ३० हून अधिक देशात भारतीय डाळिंबाची निर्यात होते. स्पेन, इराण, टर्की, इजिप्त हे काही देश भारताचे डाळिंब उत्पादनातील स्पर्धक आहेत.
जगभरातील एकूण डाळिंब निर्यातीत २२ टक्के वाटा एकट्या भारताचा आहे. त्यात युरोपसह अरब अमिराती, कतार, नेदरलँड आणि बांगलादेश या बाजारपेठा महत्त्वाच्या आहेत.
देशात डाळिंबाचे एकूण क्षेत्र २ लाख ६६ हजार हेक्टर आहे. त्यात एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक दीड लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे.