Team Agrowon
जनावरे मोकळे रान, डोंगरपट्ट्यात चरत असताना त्यांच्या खाण्यात नकळतपणे विषारी वनस्पती येतात. त्यामुळे काही वेळा विषबाधा होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन विषारी वनस्पतींची ओळख आणि त्यापासून होणाऱ्या विषबाधेबाबत माहिती आवश्यक आहे.
आपल्याकड च्या भागात गाजर गवत म्हणजेच कॉंग्रेस गवत मोठ्या प्रमाणात आढळत. काही जनावरे हे गाजरगवत चारा कमतरतेच्या काळात भुकेपोटी खातात.
गाजर गवताच्या परागकणांमुळे मनुष्यांमध्ये तसेच जनावरांना विविध प्रकारची ॲलर्जी होते. सर्दी, शिंका, अंगाला खाज सुटणे, दमा, श्वसनाचा त्रास, त्वचा विकार दिसून येतो. अशा जनावराच्या दुधाला कडवट वास येतो.
गाजरगवतामध्ये पार्थिनियम ग्लुकोसाइड शिवाय काही अल्कलॉइड्स आढळतात. त्यामुळे या गवताला कडवट व विशिष्ट घाण वास येतो. यामुळे जनावरे हे गवत खात नाहीत.
अनावधानाने जनावरांच्या खाण्यात गाजर गवत आल्यास अंगावर विविध भागांत खपल्या पडणे, मान व खांद्याच्या भागावरील केस जाणे आणि त्वचा पांढरी पडणे, पापण्या आणि चेहऱ्याच्या स्नायूभोवती खाज येणे, अतिसार, त्यानंतर त्वचेवर सूज येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
वेळेवर उपचार न झाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. जनावराच्या खाण्यात गाजर गवत किंवा इतर विषारी वनस्पती येऊ नये यासाठी विषारी वनस्पती असलेल्या ठिकाणी जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.
जनावराला पूरक चारा, पाणी द्यावे. काही वेळा चाऱ्याच्या कमतरतेमुळे भूक भागविण्यासाठी जनावरे गाजर गवत खातात. चारा कापताना गाजर गवत चांगल्या चाऱ्यांमध्ये येणार नाही, याची काळजी घ्यावी.