महारुद्र मंगनाळे
पहाटे चार वाजता लख्खं उजाडलय.तेव्हापासून जागीच आहे. विविध पक्ष्यांचे आवाज आणि नदीच्या पाण्याचं लयबद्ध मधूर संगीत सोडलं तर कानावर दुसरा कुठलाच आवाज आलेला नाही.
हे ऐकत मस्त पडून राहिलो. सात वाजता खाली जाऊन घर मालकाकडून बॉटलभर गरम पाणी घेऊन आलो. पाणी पिऊन परत झोपलो. काहीतरी मजेशीर स्वप्न पडल्याने आठ वाजता उठलो.
खिडकीतून आशूच्या कॉटवर ऊन आलं होतं. तो जागी असल्याचा अंदाज घेऊन विचारलं, कॉफी घेणार का? त्याचा होकार येताच, दोन ग्लास कॉफी बनवली.
व्हिएतनामचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी ब्रू कॉफीच्या पुड्या सोबत नेल्यात. कॉफी पिताना मी म्हटलं, कालचा चालण्याचा माझा जो अनुभव होता.
तो शब्दात मांडता येणार नाही किंवा तो कल्पनेत जगणंही शक्य नाही. हा अनुभवच घ्यावा लागतो. हा अनुभव पैशाने घेता येत नाही.
डोंगर माणसाला खुप काही शिकवतात. त्यातही ती तुम्ही निसर्गासमोर किती किरकोळ आहात,हे दाखवून नम्र बनवतात.
इथं मुक्कामी आल्यानंतर मला व्हिएतनाम मधील बेकॉन गावाची आठवण झाली. तिथंही असाच निसर्ग होता.