Team Agrowon
जनावरांना वेळेवर व नियमित पुरेसा चारा व पाणी न मिळाल्यामुळे त्यांचे कुपोषण होते, तर बऱ्याच वेळा चरायला सोडल्यानंतर जनावरांना खाण्यास काहीच न मिळाल्यामुळे त्यांची उपासमार होते.
खोल गेलेले डोळे व ऱ्हाट त्वचा, आखडलेल्या मांसपेशी ही कुपोषण व उपासमारीची लक्षणे आहेत. कुपोषण व उपासमार टाळण्यासाठी जातिवंत, उत्पादनक जनावरांचे चाऱ्याच्या उपलब्धेनुसार संगोपन करावे.
चयापचयाचे आजार सर्वसाधारणपणे आहारातून कमी ऊर्जेचा पुरवठा झाल्यामुळे उद्भवतात. चरायला बाहेर फिरणाऱ्या जनावरांना तर जास्तीच्या ऊर्जेची गरज असते. परंतु, टंचाई काळात ही गरज पूर्ण न होता उलट फिरण्यावर विनाकारण ऊर्जा खर्ची पडते.
जनावरांचे वजन दिवसेंदिवस घटत जाते. ही स्थिती मुख्यतः गाभण जनावरांमध्ये लवकर आढळून येते. ही समस्या टाळण्यासाठी आपल्या जनावरांना निकृष्ठ चाऱ्यासोबत योग्य प्रमाणात पशुखाद्य व क्षार मिश्रण द्यावे.
अपुऱ्या चाऱ्यामुळे जनावरांची भूक पुर्णपणे भागत नाही. त्यांचे पोट भरत नाही, त्यामुळे जनावरं कोणतीही हिरवी वनस्पती, खुरटी झुडपं चारा समजून खातात. त्यामध्ये असणाऱ्या नायट्राईट, सायनाईड किंवा इतर घटकांमुळे जनावरांना विषबाधा होऊन जनावरं दगावतात. विषबाधेची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत, जेणेकरून जनावरं दगावणार नाहीत.
खराब वातावरण किंवा खुराकातील धान्याच्या प्रमाणातील बदल यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या उद्भवते. चाऱ्याची उपलब्धता कमी असल्यास किंवा निकृष्ट चारा असल्यास बरेच पशुपालक आपल्याकडील जनावरांना घरातील धान्य भरडून देतात, तसेच चंदी, खुराकातील घटकांचे, धान्याचे प्रमाण अचानक बदलतात, त्यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या निर्माण होते.