Team Agrowon
येत्या खरीप हंगामात सोयाबीनपेरणी करताना वाण निवड ही जशी महत्वाची बाब आहे तसच सोयाबीनची पेरणी करताना सुधारित तंत्रज्ञानातील बाबींचा अभ्यास असणही गरजेच आहे. त्यानुसार सोयाबीनच व्यवस्थापन केल्यास एकरी समाधानकारक उत्पादकता व गुणवत्ता मिळवणे शक्य होईल.
मागील खरिपात अथवा उन्हाळी हंगामात ज्या शेतात सोयाबीन घेतले होते त्या शेतात पुन्हा यंदाच्या हंगामात सोयाबीन पीक घेऊ नये. यावर्षी फेरपालटीस प्राध्यान्यक्रम द्यावा.
मागील हंगामात जास्त पावसाच्या स्थितीत शेतात पाणी साचून राहिल्याने मूळसड व मानकुज या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. तसेच पिकाची अतिरिक्त वाढ झाल्याने किंवा पीक दाटल्याने सोयाबीनवर खोडमाशीच्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन उत्पादकता कमी झाली. अशा शेतांत पुन्हा सोयाबीन घेण्याशिवाय पर्याय नसल्यास नांगरट १५-२० सेंमी खोलीपर्यंत करावी.
अळीच्या नियंत्रणासाठी शेवटची वाही देताना म्हणजेच वखरणी, कुळवण किंवा रोटाव्हेर वापरताना अथवा पट्टीपास मारताना एकरी ४ ते ५ किलो कारटाप हायड्रोक्लोराइड अथवा दाणेदार क्लोरपायरिफॉस शिफारशीनुसार द्यावे.
मूळसड, मानकुज व खोडमाशीची अळी यांच्यापासून प्रतिबंध म्हणून शिफारशीत रसायनांची सोयाबीनच्या बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
पेरणीच्या दिवशी सकाळी अथवा पेरणीपूर्वी अर्धा ते एक तास आधी जिवाणूसंघ असलेल्या घटकाची १० ते २५ मिलि किंवा द्रवस्वरूपातील ट्रायकोडर्मा ५ ते १० मिलि प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लगेच पेरणी करावी.
पीक आणि तणे यांच्यातील तीव्र स्पर्धेचा काळ पेरणीपासून ३२ ते ३५ दिवसांपासून ते ४० ते ४२ दिवसांपर्यंत असतो. यात प्राधान्याने मजुरांद्वारे निंदणी (खुरपणी), डवऱ्याचे फेर (कोळपणी), पेरणीपश्चात मात्र उगवणीपूर्व व उगवणी पश्चात तणनाशकाचा वापर असा क्रम ठेवावा.