Team Agrowon
वैशाख महिन्याच्या रणरणत्या उन्हात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी तीळ व ज्वारी पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार असल्याचे चित्र आहे.
पुसद परिसरात बागायतीची सोय असणारे शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भुईमूग पिकाची पेरणी करायचे. परंतु निकृष्ट बियाणे, लागवड खर्च, निंदण, खते, फवारणी, पाणी देणे आदींसह काढणीसाठी लागणारा खर्च देखील या पिकातून निघत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून कमी खर्चातील उन्हाळी तीळ व उन्हाळी ज्वारी पिकाला पसंती देत आहेत.
उन्हाळी पांढरी शुभ्र होणारी ज्वारी व गुरांसाठीचा चारा कडबा याची मागणी असल्याने उन्हाळी पिकांतर्गत उन्हाळी तीळ हा पांढरा शुभ्र होत असल्याने भाव खाऊन जातात.
वन्यप्राण्यांकडून कुठलाही धोका नसल्याने शेतकरी उन्हाळी तिळाकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वळले आहेत.
यंदा ज्वारी व तिळाचे पीक हाती आले असताना अवकाळी पावसामुळे पीक धोक्यात सापडले आहे.
उन्हाळी ज्वारी १०९ हेक्टर, तर तिळाची पेरणी ४१ हेक्टरवर करण्यात आल्याचा अहवाल कृषी विभागाने घोषित केला आहे.
उन्हाळी ज्वारी एकरी बारा ते पंधरा क्विंटल होते. खर्च वजा जाता एकरी चाळीस हजार रुपये नफा शेतकऱ्यांना होत असतो.