महारुद्र मंगनाळे
सकाळी सहा वाजता नवेली बाहेर आल्यानंतरचा माहोल बघून चकीत झालो.रात्री चंद्राच्या प्रकाशाने सगळा आसमंत उजळून निघालेला होता.आकाशात ढग नव्हते आणि आता आकाश काळ्याभोर ढगांनी भरलेलं.
गरजण्याचा आवाज येत होता. मधेच बारीक थेंब तुटत होते.कुठंतरी पाऊस पडल्याचा गंध वाऱ्यात जाणवत होता.पाऊस कधीही सुरू होईल,असचं वातावरण होतं. हटकडं जाता जाता कोणती कामं महत्त्वाची आहेत,त्याची मनातल्या मनात यादी केली. फिरायला जायचा प्रश्नच नव्हता.
सकाळचा स्पेशल काळा चहा पिऊन जनावरांच्या शेडकडं आलो. रास केलेल्या रानावर ज्वारीच्या भरडणाचं एक चुंगड, ताडपत्री होती. ज्वारीची रास करताना पडलेली गुळी आणि गोंडर आम्ही गोळा केलं. नरेशने सगळ्या जनावरांना ते नेऊन टाकलं.
भरडणाचं पोतं खोलीत आणलं.ताडपत्रीची घडी करून बांधून ठेऊन दिली. रानावर पडलेला कडबा अद्याप नीट वाळलेला नाही. तो उभा करून खोपी घालावी असा विचार केला. पण लक्षात आलं की, पेंढ्या बांधताना त्यांची बुडं ठासली गेली नाहीत. त्यामुळं चिपाडं खाली-वर आहेत.
शिवाय पेंढ्यांची बांधणी मजबूत झालेली नाही. त्यामुळं यांचं खुबाड( पंचवीस -तीस पेंढ्या एकत्र उभ्या करणं) घालणं कठीण आहे... आणि कसंतरी उभं केलं तरी,वाऱ्यामध्ये ते टिकणार नाही.त्यामुळं तो विचार सोडून दिला.
सव्वा आठ वाजता नरेश गबरूला शाळेत सोडायला गेला. मी विचार केला, वावरातील पेंढ्यांचं जे व्हायचं ते होईल. पण किमान आठ- दहा दिवसाची वैरण चाऱ्याच्या शेडमध्ये टाकावी, म्हणजे त्याची कुट्टी करता येईल, असा विचार केला. नऊ वाजेपर्यंत वावरातून ५०-६० पेंढ्या आणून शेडमध्ये रचल्या. आठवडाभर पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. तेवढी चिंता मिटली. पावसाच्या पार्श्वभूमीवरची तातडीची कामं संपवली.