Team Agrowon
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा आज शुभारंभ करण्यात आला.
यावेळी निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे आणि डॉ. सुजय विखे-पाटील आदी उपस्थित होते.
निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा विश्वास देतानाच धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
या शासनाने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. अकरा महिन्याच्या कालावधीत २९ प्रकल्पांना तात्काळ सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यामुळे राज्यातील ६ लाख ८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शासन काम करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना निकषाच्या दुप्पटीने मदत देण्यात आली . राज्याने २५ लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय शेतीचे उद्दिष्ट ठेवले असून जलयुक्त शिवार योजना टप्पा २ सुरू करण्यात आला आहे.