Team Agrowon
वेळ सकाळी दहा. मी, सुनील, संजय यांनी मिळून भात, नाचणी, मका, ज्वारी, वरी आणि भाजीपाला पिकांच्या जवळपास दीडशे जातींचे प्रदर्शन मांडले.
आम्ही तयार झालो आणि काही मिनिटांत ८ वी आणि ९ वी चे विद्यार्थी हॉलमध्ये जमा झाले. आणि सुरू झाली पिकांच्या देशी जातींच्या संवर्धनाची चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण.
जवळपास दीड तास आमचा संवाद झाला. मग आम्ही विद्यार्थ्यांना एक उपक्रम दिला. घरी गेल्यावर आज्जी, आजोबाला विचारायचे की, तुम्ही लहान असताना तुमच्या रोजच्या जेवणात काय असायचे? भाजी, भाकरी, पालेभाज्या, हंगामी फळे कोणती असायची?
दुसऱ्या दिवशी हेच प्रश्न आई, वडिलांना विचारायचे आणि तिसऱ्या दिवशी सध्या तुमच्या रोजच्या जेवणात कोणती भाजी, भाकरी, हंगामी फळे असतात, याची तीन स्वतंत्र कागदावर नोंद करायची.
विद्यार्थी हे ऐकून खरोखर गंभीर झाले. हेच आम्हाला अपेक्षित होते. मग आम्ही सर्वांनी मिळून एक संकल्प केला की, मुला-मुलींचे गट पाडून पुढील चार महिन्यात गावशिवारातील विविध पिके, त्यांच्या देशी जाती, रानफळे, डोंगरी गवत, रानभाज्या तसेच दिसणारे पशू पक्षी, वनस्पती यांच्या नोंदी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने ठेवायच्या.
मुला-मुलींनी गावशिवारातील रानभाज्या आणि त्याची रेसिपी लिहून एक पाककृती पुस्तक तयार करायचे. मुली एकदम खुश होत्या. त्यांनी जवळपास १५ रानभाज्या आम्हाला सांगितल्या; ज्यांची नावे आम्हाला देखील माहिती नव्हती.
आमचं आता पक्कं ठरलंय की, येत्या चार महिन्यांत आपणच आपल्या आंबा गावाचे जैवविविधता रजिस्टर तयार करायचे आणि १५ ऑगस्ट रोजी झेंडा वंदन झाले की, ते ग्रामपंचायतीकडे द्यायचे.
गावाने काय गमावले आणि ते परत मिळून सर्वांनी एकत्र येऊन संवर्धन करायचे, याचा संकल्प आम्ही सोडलाय.
या चर्चेतून आम्हाला मुला-मुलींनी आंबा गाव शिवारातील दुर्लक्षित ३ देशी आंबा जाती, २ फणस जाती शोधून दिल्यात, हेच आमच्या धडपडीचे फलित म्हणावे लागेल.