Team Agrowon
सांगली जिल्ह्यात सांगली-पलूस राज्यमार्गावर नांद्रे गाव वसले आहे. गावाच्या अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर कृष्णा नदी आहे. त्यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळते.
या गावातील दर्गा देशभरात प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर शर्यतीसाठी लागणारा बैलगाडा तयार करण्याचा कारखाना याच गावात आहे.
त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील शर्यतीचे शौकीन खरेदीसाठी याच गावात येतात. ऊस हे गावचे प्रमुख पीक.
गावातील बाहुबली धन्यकुमार पाचोरे पाचोरे हे युवा शेतकरी. त्यांची दहा एकर शेती आहे. त्यात हंगामी पिकांसह ऊस, भाजीपाला पिकांची लागवड असायची. संपूर्ण शेती वडीलच पाहायचे.
वडिलांचे २००५ मध्ये निधन झाल्यानंतर शेतीची जबाबदारी पाचोरे बंधूंवर आली. वडिलांनी दिलेल्या शेतीच्या ज्ञानातूनच ते शेती कसू लागले. ऊस आणि हळद ही प्रमुख पिके घेण्यास सुरुवात केली.
शेतीतील अर्थकारण उंचावण्यासह अजून ताज्या उत्पन्नाची गरज भासू लागली. त्यातून नव्या पिकाची गरज लक्षात आली. त्यातून वांगे हे पीक समोर आले. या पिकातील बारकावे, अडचणी, जाणून घेतल्या. सन २०१३ ला एक एकर लागवड केली.