Team Agrowon
वातावरणातील बदलांमुळे हापूसचे उत्पादन पंधरा टक्केच राहील, यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्याचा परिणाम शेवटच्या टप्प्यातील आंबा प्रक्रिया उद्योगावर होणार आहे.
कॅनिंगचा आंबा खरेदी करण्यासाठी दुप्पट दर प्रक्रियादारांना द्यावा लागतील. परिणामी प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुक वाढण्याची शक्यता आहे.
देश-विदेशातील खवय्यांना आमरसाची गोडी चाखण्यासाठी अधिक दाम द्यावे लागणार आहेत. कॅनिंगसाठी हापूस मिळणे दुरापास्त होणार आहे.
आंबा प्रक्रियेसाठी आवश्यक माल मिळत नसल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. याचा फटका जिल्ह्यातील अनेक प्रक्रिया उद्योगांना बसणार आहे. हापूसच्या आमरसाचा ३ किलोचा डबा सुमारे ५०० ते ६०० रुपयांना मिळत होता. तो १५० ते २५० रुपयांनी वाढू शकतो, असा अंदाज आहे.
उष्णतेमुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याचीही मोठी गळ झाली आहे. त्यामुळे कॅनिंगला अपेक्षित आंबा मिळणे अशक्य आहे. उत्पादन अवघे पंधरा टक्केच राहील. त्यामुळे बाजारातील आंब्याचे दर चढे आहेत.
पाच डझनाच्या पेटीला पाच हजार रुपये मोजावे लागतात. डागी आंबाही चांगल्या दराने विकला जात असल्यामुळे कॅनिंगसाठी आंबा कमी पडणार आहे. किलोने आंबा विक्रीसाठी व्यावसायिकच तयार नाहीत. त्यामुळे कॅनिंगचे दर वाढणार आहेत.