अमित गद्रे
कोळस, मळवे, महासिर, कानस, शेंगाळी, मळे या नदी, तलावातील स्थानिक मत्स्य प्रजाती.
(Local Fish Species) परंतु अनियंत्रित मासेमारीमुळे या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
या प्रजातींच्या संवर्धनासाठी आंबा (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्थेने तीन वर्षांपासून विशेष प्रकल्प हाती घेतला आहे.
या माध्यमातून नष्ट होत चाललेल्या स्थानिक माशांच्या प्रजातीचे हॅचरीमध्ये मत्स्यबीज तयार करून त्यांना मूळ अधिवासामध्ये म्हणजेच नदी, तलावात सोडण्यात येते. या उपक्रमाला गावकऱ्यांची चांगली साथ मिळाली आहे.
याबाबत माहिती देताना वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्थेचे प्रमुख प्रमोद माळी म्हणाले, की गेल्या तीन वर्षांपासून आम्ही कडवी, कासारी नदी खोऱ्यांतून नष्ट होत चाललेल्या कोळस, मळवे, महासिर या माशांच्या प्रजातीचे संवर्धन करत आहोत.
या माशांचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात प्रवाहाच्या विरोधात जाऊन कमी पाण्याच्या ठिकाणी अंडी घालतात.
यास ग्रामीण भाषेत ‘चढणीचे मासे’ म्हणतात. जून ते ऑक्टोबर या काळात रात्रीच्या वेळी स्थानिक लोक नदी, ओढ्याच्या काठावर बरचीच्या साह्याने चढणीचे मासे मारतात.
मोठ्या प्रमाणात मासेमारी वाढल्याने या प्रजाती येत्या काही वर्षांत नष्ट होतील की काय, अशी शक्यता असल्याने आम्ही लोकांमध्ये जनजागृती सुरू केली.
प्रमोद माळी यांनी गावशिवारात स्थानिक मत्स्य जातींच्या संवर्धनासाठी जनजागृती तसेच मत्स्यबीज संवर्धनासाठी हॅचरी तयार केली.