sandeep Shirguppe
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणातील बदल विभागामार्फत नागरी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी शाश्वत विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.
यामध्ये माझी वसुंधरा अभियान ४.० व कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याच्या निवडे गावच्या ग्रामपंचायतीने असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याने याचे जिल्ह्यात स्वागत होत आहे.
नवविवाह झालेल्या दाम्पत्यानी कागदपत्रांबरोबर आपल्या जमिनीत कोणत्याही प्रकारची दोन नवीन वृक्ष लागवड करून त्या वृक्षांसोबत छायाचित्र काढून विवाह नोंदणी दाखला मिळण्यासाठी ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक केले आहे.
हा ठराव १४ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामसभेमध्ये सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. ज्या व्यक्तीची जमीन कमी असेल किंवा घर मर्यादित असेल अशा ग्रामस्थांनी देखील दोन वृक्ष लागवड करायची आहे.
ज्या शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात जमीन असेल अशी शेतकरी दोन पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याचाही निर्णय या ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान झाडे लावण्याने आपल्या उत्पन्नाचे साधन देखील वाढेल यामुळे पडीक जमीन लागवडीखालील किंवा अन्य पिकाखाली येऊ शकते.
याबाबत निवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रसाद झोरे म्हणाले की, नवविवाहितांना दाखला मिळण्यासाठी आपल्या जागेमध्ये दोन वृक्षांची लागवड केल्याचे छायाचित्र देण्याचे बंधनकारक केले आहे.
सदरचे छायाचित्र सादर केल्यावरच विवाहनोंद दाखला देण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीचे महत्व समजावून देत आम्ही गावकऱ्यांच्या सहमतीने हा निर्णय घेतला आहे.