Team Agrowon
डाळिंबाची मृग बहराची बाग सध्या फळ ‘सेटिंग’च्या अवस्थेत आहे. या बागांना संरक्षित पाणी द्याव. याशिवाय आच्छादनही करुन बाष्परोधकाची फवारणी करावी. पाण्याच्या ताणामुळे वाढीच्या अवस्थेतील बागांमधील फळांचा आकार लहान झाला आहे. काही ठिकाणी फळगळ, फूलगळ दिसत आहे. या ठिकाणी फळांची विरळणी करा.
सीताफळ बागेत लवकर बहर धरलेल्या बागेतील फळांचा हंगाम संपला आहे. पण पाणी कमी पडल्याने फळांचा आकार कमी राहिलेला आहे. ज्या बागा फळ सेटिंगच्या अवस्थेत आहेत त्याठिकाणी पाण्याचा ताण बसल्याने फळांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या बागांमध्ये संरक्षित पाणी द्या.
केळी बागेत मागील काही दिवसांपासून वातावरण उष्ण, दमट आहे. त्यामुळे केळीवर ‘पोंगा कूज’ या रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोंगा आणि जमिनीलगतचा बुंधा कुजतो. अशा बागेला वेळापत्रकानुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात.
काही भागांमध्ये मिलीबग किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. या ठिकाणी तातडीने उपाययोजना करताना खोडांची व फांद्यांची स्वच्छता करा. मिलीबगची पिल्ले खोडावरून झाडावर चढतात. यासाठी उपाय म्हणून १५ ते २० सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिक पट्टी खोडाला बांधून, त्यावर ग्रीस लावावे. या ग्रीसला पिल्ले चिकटून मरतात.
संत्रा बागेत काही भागात ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यान फळगळ दिसत आहे. काही भागात अजूनही पुरेसा पाऊस नसल्यान बागेला ताण बसला आहे. त्यामुळे देखील फळगळ दिसत आहे. अशा बागांमध्ये एक टक्का पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करा. यामुळे झाडावरील ताण कमी होऊन बागेचे, पोषण होण्ईयास मदत होईल.
संत्रा बागेत बऱ्याचशा भागात मागील महिन्यात जोराचा पाऊस झालाय अशाठिकाणी बागेत पाणी साचल्याने फळगळ झाली होती. अशा बागेत वाफसा लवकर येण्यासाठी दोन ओळीत चर काढून घ्यावा.
अंजीर बागेत पुरेसा पाऊस नसल्याने खट्टा बहराचे नियोजन लांबले आहे. त्यामुळे फळांच उत्पादन उशिरा सुरू होऊ शकतं. त्यामुळे अंजीर बागेला लवकरात लवकर पाणी द्या. अशाप्रकारे फळबागेत विविध उपाय करुन कमी पाण्यातही फळबाग तग धरुन राहू शकेल.