Team Agrowon
उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करुन पिकांना योग्य प्रमाणात पाणी द्यावे लागते. यामध्ये आच्छादन, मटका सिंचन, फळझाडांची छाटणी, ठिबक सिंचन, बाष्पोत्सर्जनाचा वापर अशा तंत्राचा अवलंब केला जातो.
कमी क्षेत्रावरिल फळबागेमध्ये मटका सिंचनाचा वापर करता येतो. पाण्याचा कार्यक्षमरीत्या वापर होणाऱ्या या पद्धतीत कमी वयाच्या फळझाडांसाठी ५ ते ६ लिटर क्षमतेचे व मोठ्या फळझाडांसाठी १५ लिटर क्षमतेचे मडके निवडावे.
वाढत्या तापमानामुळे झाडांवरील पानांमधून पाण्याचे उत्सर्जन होत असते. पानांमधील पर्नरंध्रे पाणी बाहेर टाकत असतात, त्यामुळे झाडाची छाटणी करुन झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. त्यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. झाडे जगण्यास मदत होते.
झाडावरील पानांची संख्या कमी करावी म्हणजेच ३० टक्के पानोळ्याची छाटणी करावी. ज्या फळबागा फळावर असतील परंतु पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास अशा वेळी फळांची संख्या कमी केल्याने देखील झाडांना पाण्याची गरज कमी पडते.
पानांच्या पर्नरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ८ टक्के केओलीन म्हणजेच ८०० ग्रॅम केओलीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे झाडाचे तापमान कमी होते आणि झाडाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. आणि कमीत कमी पाण्यामध्ये सुद्धा झाड तग धरुन राहते.
झाडाच्या खोडाला १ टक्का बोर्डोपेस्ट लावल्याने खोडावर पडणारा सुर्यप्रकाश परावर्तीत होऊ झाडाचे उन्हापासून संरक्षण होते व होणारे नुकसान टाळता येते.
फळबागांमध्ये खोडाभोवती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते. मातीचा थर आच्छादनाप्रमाणे काम करतो.