Team Agrowon
सातत्याने आर्थिक तोट्यात असणारी एसटी नव्या वर्षात किमान नफा मिळवून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांत दिसत आहे.
प्रवासी संख्या वाढत असल्याने एसटीच्या महसुलात वाढ होत आहे. गेल्या चार महिन्यात एसटी महामंडळाला राज्य सरकारने शून्य अर्थसाहाय्य केले आहे.
एसटीचे प्रवाशेत्तर सरासरी वार्षिक उत्पन्न ६७ कोटी आहे. कोरोनाकाळात एसटीचा संचित तोटा १२ हजार कोटी होता. त्यात घट होऊन संचित तोटा नऊ हजार कोटींवर आला आहे. तब्बल १० वर्षांनी एसटीचा नफा नोव्हेंबर महिन्यात १७ कोटी रुपयांचा झाला आहे.
एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचे दळणवळणाचे मुख्य साधन आहे. परिवहन महामंडळाची एसटी बस हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वाहतुकीची सेवा देते.
मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या संकटांमुळे एसटी ही तोट्यात होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते.
त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा झाल्याची बाब समोर आली होती. गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसा देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती.