Team Agrowon
राज्यात दूध भेसळीचा प्रकार गंभीर आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत त्यामुळे तपासणी होत नाही. त्यामुळे ‘आरे’मधील कर्मचारी अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
शासन कठोर पावले उचलते आहे. पुढील आठवड्यात राज्यातील दूध संघाची बैठक घेणार आहोत, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
नगर येथे बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘‘राज्यात दूध भेसळीबाबत परिस्थिती गंभीर आहे. मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरात भेसळीचे कारखाने असल्याची सरकारकडे माहिती आहे. नगर जिल्ह्यात मागील काळात श्रीगोंद्यात भेसळ पकडली.
पारनेरला सर्वाधिक दूध भेसळ होत आहे. एकट्या नगर जिल्ह्यात ६० हजार लिटर दूध भेसळ होत असल्याचे आढळून आले आहे. दुधाची भेसळ हे खासगी दूधसंघ वाले स्वीकारतात. भेसळीच्या दुधापासून प्रक्रिया करतात.
सर्वसामान्यांच्या जीवनाशी हे भेसळखोर खेळ करत आहेत. दुधासाठी लागणारे पशुखाद्य याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवले आहेत. मुळात अनेक पशुखाद्य उत्पादक त्या खाद्याविषयीची सखोल माहिती पाकिटावर छापत नाहीत अशा कंपन्यांवरही राज्य शासन कारवाई करणार आहे.
दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलली असून, पुढील आठवड्यात राज्यातील दूध संघाची बैठक घेणार आहोत. दूध भेसळ रोखण्याच्या तपासणीसाठी ‘आरे’चे कर्मचारी अन्न औषधकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे.
दूध भेसळसह अनेक बाबी तपासण्याची या विभागावर जबाबदारी आहे. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. मात्र जे आहेत ते कायद्याचा धाक दाखवून पैसे उकळण्याचे काम करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.