Team Agrowon
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 'शासन आपल्या दारी' हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत कोल्हापूर येथील तपोवन मैदानात कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते एकाच दिवशी विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात ७५ हजार उद्दिष्टांच्या दुप्पट म्हणजे १ लाख ५८ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
राज्यातील जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सरकारने आयोजित केला आहे.
या अभियानाद्वारे नागरिकांना एकाच छताखाली जलदगतीने विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केले.
११ महिन्यांचा कालावधी
कोल्हापुरच्या विकासासाठी सरकारने विविध विभागांच्या माध्यमातून गेल्या ११ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ७६२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.