Team Agrowon
कलिंगड, पपई आणि टरबूज या फळांबरोबर आंब्याला मोठी मागणी असल्यामुळे मुंबईच्या घाऊक बाजारात दररोज ५० गाड्यांची आवक होत असल्याने बाजारालाही उठाव आल्याचे चित्र आहे.
वाढता उन्हाचा तडाखा आणि सोबत रमजान महिना सुरू असल्याने सध्या बाजारात फळांना विशेष मागणी आहे.
उन्हाळ्यात जागोजागी फळांचे रस, फळांचे सॅलड यांच्या गाड्या लागलेल्या दिसतात. घरी खाण्यासाठीही लोक फळांची खरेदी आवर्जून करतात.
सध्या बाजारात फळांना मागणी वाढली आहे. मात्र, तरीही फळांच्या किमती मात्र स्थिर आहेत. बाजारात फळांना चांगला दर मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
रमजान महिन्यात रोजे सोडण्यासाठी बहुतांश लोक फळांचे सेवन करतात. त्यामुळे या रसदार फळांना मोठी मागणी आहे. म्हणूनच कलिंगड, पपई, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
एरवी या फळांच्या १० ते १५ गाड्या दररोज बाजारात येत असतात. मात्र, सध्या ५० गाड्यांची आवक होत असल्याने महिनाभर फळांचा हंगाम असाच राहणार आहे.