Swapnil Shinde
राज्यात अवर्षणामुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर राज्य सरकारने १५ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात येणार आल्याची माहिती समोर आली आहे.
यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने १५ जिल्ह्यांतील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असली तरी निकषांच्या छाननीनंतर ४२ पैकी ४० तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील १९४ तालुक्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
केंद्र सरकारने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या शास्त्रीय निकषांच्या कसोटीवर राज्यातील ४२ तालुके पात्र ठरले आहेत.
पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानातील तूट तपासल्यानंतर सरासरी पर्जन्य तपासून दुसरा ट्रिगर लागू होतो. दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरमध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक, यामध्ये सामान्य फरक वनस्पती निर्देशांक सामान्य आर्द्रता निर्देशांक आणि वनस्पती स्थिती निर्देशांक तपासण्यात येतात.
वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आर्द्रता निर्देशांक, पाणीविषयक निर्देशांक, भूजल पातळी निर्देशांक आदी निर्देशांक तपासले जातात.
दुष्काळ जाहीर करण्याचा आदेश आल्यानंतर जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट आदी सुविधा मिळतील.