sandeep Shirguppe
अलमट्टी, कोयना धरणातील पाणीसाठा व त्याच्या परिचलनाबाबत सूचनांचे पालन न केल्यास पंधरा ऑगस्टपर्यंत महापुराचा पुन्हा धोका संभवण्याची भिती एका निवेदनाद्वारे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी व्यक्त केली आहे.
अलमट्टी धरणामुळे महापुराचा धोका निर्माण होतो. १२३.०८ टीएमसी क्षमता असलेले धरण ११७.३ टीएमसी भरले आहे. दरम्यान हे धरण भरले की महापुराचा धोका निश्चितच वाढणार आहे.
अशातच कोयना, वारणा, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि अन्य सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
कोयना धरणात सध्या ७९.७० टीएमसी व वारणा धरणात २९.१७ टीएमसी पाणी आहे. परंतु पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, तर ही दोन्ही धरणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे लवकरच भरतील
मग विसर्ग प्रचंड प्रमाणात वाढवावा लागेल. त्याचवेळी अलमट्टी धरणातून विसर्ग कमी असेल, तर महापुराचा धोका संभवण्याची भिती आहे.
सध्या अलमट्टी धरणात आवक जास्त आणि जावक कमी असल्याने पाण्याचा दाब सांगली कोल्हापुरातील नद्यांना बसू शकतो. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचे प्रमाण चार-पाच दिवसांत वाढणार आहे.
याबाबत राज्य शासन व जलसंपदा विभाग यांनी तातडीने कर्नाटकाशी समन्वय साधून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला पाहिजे.
अन्यथा गंभीर स्थिती निर्माण होईल. यंत्रणेने आधी महापूर येऊ नये, यासाठी उपायांकडे लक्ष द्यावे असे सांगण्यात आले आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाली असून नदी पात्रात आली आहे. दरम्यान पुन्हा पाऊस सुरू झाल्यास पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्याही पात्रता गेल्या आहेत.