अमित गद्रे
परवा चार दिवस कामानिमित्त माझ्या आंबा (जि. कोल्हापूर) गावी होतो. गावात जत्रेचा माहोल होता. पहिल्या दिवशी बैलगाडा शर्यतीचे मैदान होते. कोरोना नंतर मोठ्या प्रमाणात जत्रा आणि मैदान असल्याने गावाचा नूर वेगळाच होता.
मग काय गावच्या जत्रेचे मैदान पहायचे ठरवले. त्याचे मुख्य कारण म्हणजे पंचक्रोशीतील जातिवंत खिलार बैलजोड्या पाहायला मिळणार होत्या, माझ्या भावाने शर्यतीचे पाहिले बक्षीस जाहीर केले होते आणि महत्वाचे म्हणजे आमच्या घरची बैलजोडी मैदानात उतरणार होती.
दुपारी भर उन्हात पावले मैदानाकडे वळली. बघतोय तर एक एक जातिवंत खिलार उभे होते. हरण्या, सरपंच, नंदया, बुलेट, सर्जा, नाग्या, बादल, वस्ताद, बाजीगर, सुंदऱ्या... एक एक नाव असणारी हे महाराष्ट्र भूषण नजरेला नजर देत होते. शेजारी मालक प्रेमाने त्याच्याकडे आणि आमच्याकडे बघून मनात खुश होत होता. तो माहोलच वेगळा होता.
कोणी बैलाला मैदान दाखवून येत होता, तर कोणी बैलाला तापवत होता. एका एक बैलाला धरायला किमान सहा गडी तयार होते. शर्यतीचा छकडा जोडण्यात काही जण रमले होते, काही जण यंदा कोणती जोडी मैदान मारणार याचीच चर्चा होती
मैदानात जाऊ लागलो तर कडेने बर्फाचे गोळे, कलिंगड, भजी, पॉपकॉर्न, पुगळ्या, शेंगदाणे विक्रीची छोटी दुकाने, हातगाड्या आणि त्यांच्या घंटीने वेगळंच वातावरण निर्माण झाले होते. कधी एकदा मैदान सुरू होतय असे झाले होते.
जवळपास ५१ बैल जोड्या मैदानात उतरल्या होत्या. मैदानाच्या स्टेजवरून घोषणा झाली की, आली रे वारूळकर पाटलांची सुंदऱ्या, हऱ्यांची जोडी...झेंडा पंचाने इशारा केला गाडी सुटली... धुरळा उडवत जोडी सुसाट...