Cotton Production Agrowon
संपादकीय

Cotton Production : आता हवी थेट कृती

विजय सुकळकर

Research on Cotton : देशात या वर्षी कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढून १०० लाख गाठींचे नुकसान होणार असून, सुमारे २५ कोटींची ही उत्पादकांची थेट वित्तीय हानी आहे. ही परिस्थिती होती पंधरा दिवसांपूर्वीची, आता या नुकसानीत अजून वाढ झालेली आहे. गुलाबी बोंड अळीबरोबर राज्यात सध्या बरसत असलेल्या परतीच्या पावसाने बोंडसड होऊन वेचणीला आलेला कापूस भिजत आहे.

असे असताना कापूस पट्ट्यात यंदा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खालीच असल्याचे निरीक्षण ‘केंद्रीय कापूस संशोधन संस्थे’च्या (सीआयसीआर) तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

अशा एकंदरीत वातावरणात सहा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र जिनर्स कॉटन असोसिएशनच्या वतीने कापूस परिषद झाली. या परिषदेमध्ये कापसाचे घटते क्षेत्र, आणि घटत्या उत्पादकतेवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

याच परिषदेमध्ये कापसाचे उत्पादन, उत्पादकता, गुणवत्ता वाढविण्याबरोबर जगभरातील कापसाच्या बाजाराचा देखील आढावा घेण्यात आला आहे. मागील दशकभरात देशात कापसाची उत्पादकता ५०० किलो रुई प्रतिहेक्टर वरून ४४० किलो रुईवर आली आहे.

महाराष्ट्रात ही उत्पादकता ३५० किलो रुई प्रतिहेक्टर एवढी कमी आहे. दशकभरापूर्वी ४०० लाख गाठींपर्यंत होणारे कापसाचे उत्पादन मागील काही वर्षांत ३५० लाख गाठींच्या वर गेले नाही.

या वर्षी तर देशात कापूस लागवड क्षेत्र सुमारे १५ लाख हेक्टरने घटले आहे. देशात घटते कापसाचे क्षेत्र आणि घटती उत्पादकता यामुळे वस्त्रोद्योग व इतर गरजेपुरते (३०० लाख गाठी) उत्पादन झाले नाही, तर कुणालाही नवल वाटू नये.

जगाची सरासरी कापूस उत्पादकता ९५० किलो रुई प्रतिहेक्टर आहे. याच्या निम्म्याहूनही कमी उत्पादकता (४४० किलो प्रतिहेक्टर) भारताची आहे. ब्राझील, तुर्की, मेक्सिको, चीन या कापूस उत्पादक देशांची उत्पादकता भारताच्या तिपटीहून अधिक (१५०० ते १६०० किलो रुई प्रतिहेक्टर) तर ऑस्ट्रेलियाची उत्पादकता आपल्या सहापट (२६०० किलो रुई प्रतिहेक्टर) आहे. सीआयसीआरने घटत्या कापूस उत्पादनाची कारणे अनेकदा शोधली, उत्पादकता वाढीचा ॲक्शन प्लॅन तयार करणार म्हणून घोषणाही केली.

परंतु देशात कापसाची उत्पादकता वाढत नसून ती घटतच चालली आहे. कापसाची घटती उत्पादकता आणि मिळणाऱ्या कमी दराने उत्पादक प्रचंड आर्थिक तणावात आहे. हवामान बदलास पूरक वाणांचा अभाव, कोरडवाहू कापसाचे अधिक क्षेत्र, पारंपरिक लागवड पद्धतीचे अनुकरण, पावसाचे कमी-जास्त प्रमाण, रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव, यांत्रिकीकरणाचा अभाव यामुळे आपली कापसाची उत्पादकता फार कमी आहे.

कापूस उत्पादकतेत आघाडीवरच्या देशांत नेमकी आपल्या उलट परिस्थिती आहे. कापसाची एकाच वेळी होणारी लागवड, अधिक उत्पादनक्षम आणि रुईचे प्रमाणही अधिक असलेल्या जातींचीच निवड, बागायती क्षेत्र अधिक, यांत्रिकीकरणाचा वापर आणि एकाच वेळी वेचणी यामुळे प्रगत देशांत कापसाची उत्पादकता अधिक मिळते. आपल्याला कापसाची उत्पादकता वाढवायची असेल तर हवामान बदलास पूरक वाणं शेतकऱ्यांना द्यावे लागतील. प्रगत लागवड तंत्राचा अवलंब आणि कापसाची शेती सिंचनावर (ठिबक) आणावी लागेल.

गुलाबी बोंड अळीला नियंत्रणात ठेवावे लागेल. कापूस लागवड ते वेचणी अशी सर्व कामे यांत्रिकीकरणाने व्हायला हवीत. लांब धाग्याच्या देशी वाणांची सघन लागवड पद्धतीने उत्पादकता वाढ आढळून आली आहे.

अशावेळी देशी वाणांची सघन लागवड २० टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल. देशात कापसाचे दर हे त्यात असलेल्या रुईच्या टक्केवारीवरून ठरवायला हवेत. देशात कापूस पिकतो, त्याच भागात कापूस ते कापड अशी पूर्ण प्रक्रिया झाली पाहिजेत.

कापसाच्या मूल्यवर्धनात उत्पादकांचा वाटा असायला हवा. असे झाले तरच देशातील कापसाची उत्पादकता वाढून उत्पादकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या सर्व बाबी विचारात घेऊन त्यावर आधारीत कृती आराखडा तयार करून त्याची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakawadi Dam : जायकवाडीतील विसर्गात घट-वाढ सुरूच

Healthy Millets : बहुगुणी भरडधान्य

Interview with Dr. B. V. Mehta : सोयाबीनचा तिढा निश्‍चितच सुटू शकतो...

Indian Agriculture : जुने हवे ते नवनिर्मितीसाठी...

Sugarcane Farming : ऊस शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT