Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या रब्बी हंगामातील पीकविमा, यंदा नुकसान झालेल्यांना भरपाई अशा प्रमुख विविध मुद्यांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी (ता. २६) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.
रब्बी आणि खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा देताना विमा कंपनीने घोळ केल्याचा त्यांचा आरोप आहे. एकाच गावातील एका शेतकऱ्याला जास्त तर दुसऱ्याला कमी मोबदला देण्यात आला. पंचनाम्यांवर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा केलेल्या नव्हत्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
जोपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १०० टक्के पीकविम्याचे पैसे खात्यात जमा होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. नऊ महिने होऊनही पैसे देण्यासाठी उशीर का केला जात आहे. आता या उशिरासाठी विमा कंपनीने शेतकऱ्यांना १२ टक्के व्याज द्यायला हवे, अशी मागणीही त्यांनी रेटून धरली.
या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी त्यांना पीकविमा वाटप, खात्यात जमा झालेल्या निधीची माहिती दिली. मात्र जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांचा लाभ दिला जात नाही, कंपनीविरुद्ध कारवाई केली जात नाही, तोवर आंदोलन कायम ठेवण्यावर ठाम असल्याचे तुपकरांनी सांगितले.
अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे कृषी विभागात गुरुवारी (ता. २६) खळबळ उडाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्तेही या कार्यालय परिसरात गोळा व्हायला सुरुवात झाली होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.