Satara News : मराठवाडी धरणातून विसर्ग थांबविल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच वांग नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गळतीमुळे कोरडे पडून शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आज दुपारपासून धरणातून पुन्हा विसर्ग सुरू केला. विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याने काठावरील गावांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
पाटबंधारे विभागाने गेल्या १८ डिसेंबरला मराठवाडी धरणातून हंगामातील पहिले आवर्तन सुरू केले होते. साधारणपणे दीड महिने ते सुरू होते. या काळात धरणाच्या लाभक्षेत्रात असलेले दहाही बंधारे ओव्हर फ्लो झाले होते.
मात्र अलीकडे सहा फेब्रुवारीला पाटबंधारे विभागाने विसर्ग थांबविल्यानंतर आठच दिवसांत नदीपात्र आणि बंधारे कोरडे पडले. काही बंधाऱ्यांना असलेल्या गळतीमुळे त्यात पाणी साठून राहात नाही. बंधारे मोकळे पडल्याने त्याच पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांपुढे बिकट प्रश्न उभा राहिला होता.
याप्रश्नी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयातून पाटबंधारे विभागाकडे सुरू असलेला पाठपुरावा आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी याचा विचार करून सहायक कार्यकारी अभियंता हर्षवर्धन भोसले यांनी दिलेल्या सूचनेनुसार धरणाच्या सिंचनद्वारे विमोचकातून विसर्ग सुरू केला आहे.
मराठवाडी धरणातील पाण्याच्या भरवशावरच लाभक्षेत्रात कऱ्हाड व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी बागायती क्षेत्र वाढवले आहे. सध्या काही बंधाऱ्यांना असलेल्या गळतीमुळे पाण्याची नासाडी होत आहे. ती टाळण्यासाठी बंधाऱ्यांच्या दुरुस्त्या हाती घ्यायला हव्यात.- मारुतीराव मोळावडे, माजी सदस्य, जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.