Nashik News : देशातील शेतकरी जगला तर हा देश जगेल ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची नाही. यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतीमालाची आधारभूत किंमत वाढावी यासाठी सदैव प्रयत्न केले. मात्र आज शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारवर केली.
येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त मंगळवारी (ता. २४) आयोजित सभेत पाटील बोलत होते. या वेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार भास्कर भगरे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्याच्या ताब्यात गेल्यावर सरकारने निर्यातबंदी उठवली.
अन् दुसऱ्या बाजूने अफगाणिस्तानचा कांदा आयात केला. हे भाजपचे धोरण असून शेतीमालाचे भाव वाढले की महागाई वाढत असे केंद्रातील सरकारला वाटते. शेतकरीविरोधी या सरकारला हिसका दाखवा, असे आवाहन पाटील यांनी या वेळी उपस्थितांना केले.
खासदार कोल्हे यांनी, येवल्यात विश्वासघात अशी ओळख निर्माण झाली असून ती येत्या निवडणुकीत पुसून टाका, असे आवाहन केले. येवला हा शरद पवारांचा बालेकिल्ला असून ते देतील तो उमेदवार सर्वांनी निवडून आणावा, असे माजी आमदार पवार म्हणाले. विठ्ठलराव शेलार यांनी प्रास्ताविक केले.
आयुब शहा यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय अध्यक्ष पंडित कांबळे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष दत्ताजी पाटील, माजी आमदार नितीन भोसले, पुरुषोत्तम कडलग, महिला जिल्हाध्यक्ष संगीता पाटील, हेमंत टकले, कल्याणराव पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष शाहू शिंदे, डॉ. संकेत शिंदे, सुभाष निकम, अकबर शहा पदाधिकारी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.