
Raigad News : वादळी वातावरणामुळे समुद्र खवळलेला असल्याने यंदा मासेमारीचा मुहूर्त हुकला आहे. अपेक्षेपेक्षा मासेमारी हंगामाला गती आलेली नाही. मुरूड तालुक्यातील ४० टक्के होड्या अजून किनारीच लागलेल्या आहेत. या मासेमारीला गती देण्यासाठी आता मच्छीमार नारळी पौर्णिमेची प्रतीक्षा करत आहेत.
जून, जुलै हे दोन महिने माशांचा प्रजननकाळ असल्याने मत्स्य विभागातर्फे मासेमारीवर निर्बंध घालण्यात येतात. दंडात्मक कारवाईपेक्षा स्वयंशिस्त म्हणून तालुक्यातील लहान, मोठे मच्छीमार मासेमारी करत नाहीत. रायगड जिल्ह्यात मासेमारी हंगाम १ ऑगस्टपासून सुरू झाला आहे; परंतु सुरुवातीलाच वादळीवारे आणि सागरी लाटांचा वेग तीव्र असल्याने व्यवसाय मंदावला. मुरूडच्या काही मच्छीमारांनी मासेमारीला सुरुवात केली आहे. ५० ते ६० टक्के बोटी समुद्रात रवाना झाल्या आहेत.
मच्छीमारांना खोल समुद्रात गेल्याशिवाय मासळी जाळ्यात येत नाहीत. समुद्रात १० ते १५ दिवसांचा मुक्काम पडत असल्याने खलाशांचा खर्च, बर्फ, डिझेल आदींवर सुमारे लाख सव्वा लाख रुपये मोजावे लागत आहेत. सद्यस्थितीत अनेक मच्छीमारांच्या होड्या किनारीच विसावलेल्या आहेत. नारळी पौर्णिमेला दर्या राजाला साकडे घालून मच्छीमारीला सुरुवात होणार आहे.सध्या मुरूड बाजारात राजपुरी, एकदरा, शिवाजी कोळीवाडा येथील स्थानिक मच्छीमार ओले बोंबील, कोळंबी, पॉपलेट आदी मासळी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणत आहेत. १०० रुपये वाट्याने बोंबील आणि कोळंबी मिळत आहे. तर मध्यम पॉपलेटच्या जोडीसाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागतात.
सध्या चांगल्या प्रतीची मासळी निर्यात योग्य असल्याने ससून डॉक व भाऊचा धक्का या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून चांगला भावही मिळत आहे. खवय्यांना बाजारात येणाऱ्या मासळीचे वेळापत्रक भरती-ओहोटीप्रमाणे लक्षात राहते. त्या अचूक वेळात खवय्यांची गर्दी होत आहे. अद्याप पर्यटकांचा ओघ नसल्याने स्थानिकांना वाजवी दरात मासळी उपलब्ध होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.