
डॉ. सुमंत पांडे
Women Empowerment : गाव गरिबी मुक्त करण्यासाठी गटांच्या स्थापनेपासून ते त्यांच्या स्थिरतेपर्यंतचा प्रवास खूप उद्बोधक असतो. गरिबांची ओळख आणि त्यांचे स्वयंसहाय्यता गट स्थापनेपासून ते कुटुंब गरिबीतून बाहेर पडेपर्यंत त्यांना सातत्याने मार्गदर्शन आणि सहकार्य आवश्यक असते.
स्वयंसहायता गटांसाठी प्रथम वित्त साहाय्य हे खेळत्या भांडवलाच्या स्वरूपात उमेद अभियानाकडून अर्थात ग्रामविकास मंत्रालयाकडून देण्यात येते. दशसूत्रीचे नियमित पालन करणाऱ्या गटांना सर्वसाधारणपणे स्थापनेच्या तीन ते सहा महिन्याच्या अंतराने कालावधीनंतर खेळते भांडवल देय ठरते. खेळते भांडवल किमान २०,००० रुपये आणि कमाल ३०,००० रुपये एवढे प्रति स्वयंसहायता गट देय असते. या पूर्वी खेळत्या भांडवलाची पत मर्यादा १० ते १५००० रुपये इतकी होती. (संदर्भ: भारतीय रिझर्व्ह बँक मार्गदर्शक सूचना २०२३) स्वयंसहायता गटांना कुठल्याही प्रकारचे अनुदान देय नसते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. महिला स्वयंसहाय्यता गटांना अनुदान देणे आता बंद झालेले आहे, तथापि त्यांना विविध मार्गांनी आर्थिक सहकार्य देण्यात येते.
१) खेळते भांडवल.
२) समुदाय निधी ज्याला कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड.
३) वंचितता कमी करण्यासाठी निधी
४) व्याजावरील अनुदान.
समुदाय निधी :
- ग्राम विकास मंत्रालय, भारत सरकारतर्फे हा निधी देण्यात येतो. हा निधी ग्राम संघ अथवा प्रभाग संघाना देण्यात येतो. या निधीचा उपयोग स्वयंसहाय्यता गटांच्या शाश्वततेसाठी देण्यात येतो. बचत गटांच्या सामाजिक- आर्थिक कामासाठी देखील याचा उपयोग होतो. बचत गटांना भाग भांडवल म्हणून देखील हा निधी देण्यात येतो.
वंचितता कमी करण्यासाठी निधी :
- बचत गटांच्या ग्रामसंघांना हा निधी गावातील वंचित कुटुंबांची वंचितता कमी करण्यासाठी देण्यात येतो. यामध्ये अन्न सुरक्षा ,आरोग्य सुविधा सुरक्षा इत्यादी कारणांसाठी वापरण्यात येतो.
व्याजावरील अनुदान :
- स्वयंसहाय्यता गटांना बँकांच्या मार्फत सुमारे १० लाख रकमेपर्यंत कर्ज विना तारण देण्यात येते. देण्यात येणाऱ्या कर्जांच्या नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याज अनुदान देण्यात येते.
- बचत गटासाठी देण्यात येणारे कर्ज हे प्राथमिकता कर्ज या सदराखाली देण्यात येते.यांचा सर्वसाधारण व्याज दर सुमारे ११.५० द.सा.द.शे असतो. (रिझर्व्ह बँकेतर्फे यात वेळोवेळी बदल करण्यात येतात).
रुपये ३ लाखापर्यंत च्या कर्जांना केवळ ७ टक्के व्याज दर आकारण्यात येतो आणि ४.५ टक्के व्याज अनुदान बँकांना थेट देण्यात येते. तीन लाखांच्यावरील कर्ज आणि पाच लाखांच्या आत कर्ज रकमेवर देखील बँकांच्या नियमानुसार व्याज अनुदान देण्यात येते. इतर यंत्रणांच्या मार्फत स्थापित गट जर दशसुत्रीचे नियमित पालन करत असतील देखील व्याज अनुदान देय असते. परंतु अशा बचत गटांची माहिती NRLM च्या संकेत स्थळावर नोंदविणे आवश्यक असते.
उमेद अंतर्गत बचत गटांचा प्रवास आणि टप्पे:
- गाव गरिबी मुक्त करण्यासाठी गटांच्या स्थापनेपासून ते त्यांच्या स्थिरतेपर्यंतचा प्रवास खूप उद्बोधक असतो. गरिबांची ओळख आणि त्यांचे स्वयंसहाय्यता गट स्थापनेपासून ते कुटुंब गरिबीतून बाहेर पडेपर्यंत त्यांना सातत्याने मार्गदर्शन आणि सहकार्य आवश्यक असते.
- गरिबांच्या संस्था (स्वयंसहाय्यता गट, त्यांचे ग्राम संघ, प्रभाग संघ) निर्माण करणे आणि त्या सक्षम आणि बळकट करणे हे त्यातील
टप्पे आहेत. यात बँकांची मदत खूप मोलाची ठरते. बचत गटांची एक दशकाची वाटचाल त्यांना निश्चित गरिबीच्या गर्तेतून बाहेर काढण्यास नक्कीच सहाय्यभूत ठरेल.
बचत गटांचे बँक लिंकेज :
- दशसुत्रीच्या नियमित पालनाने गटातील महिलांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण होते. जेथे आर्थिक शिस्त,नियमितता,पारदर्शकता असते तेथे विश्वास अधिक दृढ होतो. असे गट हे बँकेच्या दृष्टीने उत्तम ग्राहक असतात.
- गरिबी दूर करण्यासाठी त्यांना नियमित अंतराने एकापेक्षा अधिक वेळा कर्ज घेऊन त्यांचा विनियोग आपल्या उपजीविकेसाठी करणे महत्त्वाचे असते. आणि केंद्र सरकारचे देखील हेच धोरण आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने या बाबी सुलभ केलेल्या आहेत.
बँके कडून गटांना देण्यात येणाऱ्या सहाय्याच्या पद्धतीस बचत गटांचे बँक लिंकेज असे म्हणतात.
कर्ज मर्यादा :
- कर्जाची मागणी करण्यापूर्वी गटांना सूक्ष्म पत आराखडा कसा तयार करावा हे शिकवले जाते. या पत आराखड्यात आपल्या गरजा,सामाजिक गरजा, कोणत्या सावकाराकडून अधिक व्याज दराने कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड करणे, घराची दुरुस्ती, उपजीविकेसाठी शेळी, अंडी देणाऱ्या कोंबड्या, शिलाई यंत्र, इतर उपजीविकेसाठी कर्ज यांचा समावेश असतो. अनेकदा समूहाद्वारे काही उपक्रम घेतल्या जातात, त्यासाठी देखील कर्जांचा वापर केला जातो.
- बऱ्याच महिला गटातून कर्ज घेणे टाळण्याकडे कल आढळतो. कारण व्याज दर अधिक असतो,कर्ज थकले की, वसुली साठी तगादा लावला जातो.
- स्वयंसहाय्यता गटांच्या मार्फत महिलांना सुरवातीस छोटे छोटे कर्ज घेणे, त्यांचा योग्य विनियोग करणे आणि त्यांची व्यवस्थित मुदतीत परतफेड करणे याचा सराव होतो. कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा योग्य विनियोग झाल्यास महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या मग पुढच्या पायऱ्या चढत जातात.
- जास्त व्याज दराने मिळणारे आणि सावकाराचे कर्ज घेवू नये. कारण त्यात तुम्हाला तारण म्हणून स्थावर अथवा जंगम मालमत्ता गहाण ठेवावी लागते. या उलट बँका मार्फत १० लाखांपर्यंतचे कर्ज विना कारण आणि विना तारण मिळते, तशा रिझर्व्ह बँकेच्या सूचना आहेत.
- काही महिलांनी बँके कडून चार ते पाच वेळा लिंकेज करून व्यक्तिगत पातळीवर सुमारे सहा ते आठ लाखापर्यंतचे कर्ज घेऊन त्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
कर्जाचा पहिला हप्ता :
- बचत गटाच्या एकूण गंगाजळीच्या सहा पट किंवा दीड लाख या पैकी जे अधिक असेल ते आणि परतफेडीचा कालावधी २४ ते ३६ महिन्यांत मासिक/ त्रैमासिक हप्त्यांच्या स्वरूपात फेडला जाऊ शकतो तथापि महिला हे कर्ज पहिल्या वर्षांतच परतफेड करतात.
कर्जाचा दुसरा हप्ता :
- बचत गटाच्या एकूण गंगाजळी च्या आठ पट किंवा तीन लाख या पैकी जे अधिक असेल ते.
परतफेडीचा कालावधी:
- ३६ ते ४८ महिन्यांत मासिक/त्रैमासिक हप्त्यांच्या स्वरूपात फेडला जाऊ शकतो.
कर्जाचा तिसरा हप्ता : सूक्ष्म पत आराखड्यावर आधारित किमान सहा लाख या पैकी जे अधिक असेल ते.
परतफेडीचा कालावधी :
- ४८ ते ६० महिन्यांत फेडला जाऊ शकतो.मासिक/तिमाही हप्त्यांच्या स्वरूपात.
चौथ्या हप्त्या पासून पुढे :
- सूक्ष्म पत आराखड्यावर आधारित किमान सहा लाख या पैकी जे अधिक असेल ते.
- कर्जाची परतफेड ६०ते ८४ महिन्यांच्या मासिक/ तिमाही हप्त्यांमध्ये दरम्यान केली जाऊ शकते
- स्वयंसहाय्यता गट हे कर्ज मुदत कर्ज, अथवा कर्जरोखे या स्वरूपात किंवा दोनही स्वरूपात घेता येते.
.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.