
Onion Market : राज्यात कांदा प्रश्न पेटलेला आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनं घाईघाईत कांदा प्रश्नावर पांघरून टाकण्यासाठी २ लाख टन कांदा सरकार खरेदी करणार असल्याचं जाहीर केलं. परंतु या निर्णयाला किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी विरोध केला आहे.
राज्यात ४० लाख टन कांदा शिल्लक असताना फक्त २ लाख टन कांदा खरेदी करत असल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी केली. डॉ. नवले म्हणाले "राज्यातील शेतकऱ्यांकडे ४० लाख टन कांदा शिल्लक आहे. पण सरकार केवळ २ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावलं आहे. एकीकडे केंद्र सरकार खरेदीचं निर्यात शुल्क लावायचं आणि दुसरीकडे फक्त २ लाख टन कांदा खरेदी करायचा, यातून समस्या सुटणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावं आणि मग कांदा खरेदी करावी." असंही डॉ नवले म्हणाले.
कांदा प्रश्नी केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करू पाहत असल्याचा आरोप खा. अमोल कोल्हे यांनी केला. कोल्हे म्हणाले, "केंद्र सरकारनं घोषणा केली असली तरी कांद्याला २ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल नव्हे तर ४ हजार रुपये प्रतिक्विंटलनं खरेदी करावी. तसेच कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यातशुल्क रद्द करावं."
कोल्हे यांनी कांदा प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. कोल्हे म्हणाले, "उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारच्या कांदा खरेदीचं ट्विट केलं. परंतु निर्यातशुल्क मागे घेण्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे फडणवीसांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये," असेही कोल्हे म्हणाले.
कांद्याच्या प्रश्नावर पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार गट) खा. कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले आहे. केंद्र सरकारचा निर्णय आम्हाला मान्य नसून आंदोलन सुरूच राहील, असे कोल्हे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.