
इस्लामपूर, जि. सांगलीः बंद सहकारी साखर कारखाने सुरू करण्याबाबत मंत्री व कारखानदार - कामगार प्रतिनिधींसमवेत चर्चा घडवून आणू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळी शनिवार (ता. २८) आयोजित साखर कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार मानसिंग नाईक, सुमन पाटील, अरुण लाड, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले आदी उपस्थित होते. या वेळी साखर कामगारांच्या वतीने १२ टक्के पगारवाढ देण्याच्या निर्णयाबाबत पवार यांचा सत्कार झाला.
पवार म्हणाले, ‘खासगी साखर कारखन्यांपासून दृष्टी घेऊन राज्यातील सहकारी साखर कारखानदारी विस्तारली. यशवंतराव, वसंतदादा, राजारामबापू पाटील, तात्यासाहेब कोरे अशा राज्यभरातील सहकार धुरिणांनी त्यासाठी योगदान दिले. आता खासगी आणि सहकारी कारखान्यांमध्ये स्पर्धा आहे. गुणात्मक बदल होत आहेत. साखरेबरोबरच, वीज व इथेनॉलसह अनेक सहउत्पादने होत आहेत. साखर उद्योग अनेक आव्हानांना सामोरे जात टिकून आहे. तो वाढतो आहे. कामगारांना पगार मिळत नाही. आकृतिबंधपेक्षा नोकरभरती या बद्दल सहकार खात्याने कडक निर्णय घेतले पाहिजेत. दिवंगत कामगार नेत्यांनी साखर कामगारांचे आणि शेतकऱ्यांचेही हित जपले. हे पुढेही सुरू राहावे.
जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी साखर उद्योगातील शेतकरी, कामगार आणि तोडणी मजुरांसह सर्वांना न्यायाची भूमिका घेत आधार दिला. मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, काही साखर कारखाने करार करीत नाहीत आणि केला तर अंमलबजावणी करीत नाहीत. याबद्दल आम्ही लक्ष देऊ. केंद्राच्या कामगारविरोधी कायद्यांविरोधात सर्वांनी उभे राहिले पाहिजे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.