
River Banganga : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने बहुतांश नद्यांना छोटे-मोठे पूर आले आहेत. मात्र, बाणगंगा नदी मात्र कोरडीच आहे. सध्या गंगापूर कालव्याचे पाणी शेतीसाठी सुरू असून, त्या कालव्याचे पाणी बाणगंगा नदीत सोडण्याची वेळ आली आहे.
पावसाळा सुरू तीन महिने झाले असले, तरी अद्यापही बाणगंगा नदीला पूर आलेला नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दुष्काळसदृश्य स्थिती आहे. गेल्या दोन दिवसांत या भागात पाऊस झाला असला, तरी बाणगंगेला पाणी मात्र आलेले नाही. यावरून बाणगंगेच्या उगम स्थान व पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस न झाल्याने शेवटी पाटबंधारे विभागाला मागणीनुसार बाणगंगा नदीला पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
बाणगंगा नदीला आता पाणी आल्याने नदीकाठच्या आठ ते दहा गावांना या पाण्याचा फायदाच होणार आहे गंगापूर डाव्या कालव्यातून खरीप हंगामात पाऊसच न पडल्याने शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनातून ओझरनजीक बाणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे बाणगंगा नदीकाठावरील गावांचा पाणीप्रश्न आता तूर्तास मिटणार आहे.
बाणगंगा नदीला पाणी आल्याने नदीकाठच्या आठ गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. गंगापूर डावा कालव्यातून रब्बी व उन्हाळ पिकांसाठी पाणी सोडले जाते. मात्र, या वर्षी पावसाळ्यात पाऊसच न पडल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे असल्याने पाटबंधारे विभागाने खरीप पिकासाठी पाणी सोडले.
त्यावेळी नदीकाठच्या गावांनी बाणगंगा नदीला पाणी सोडावे, असा आग्रह धरला. त्यानुसार ऐन पावसाळ्यात बाणगंगा नदीला कालव्याचे पाणी सोडल्याने पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नदीकाठावरील ओझर, बाणगंगा नगर, दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे आदी गावांना फायदा होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.