
ॲग्रोवन वृत्तसेवा
Mango - Cashew Producer : सिंधुदुर्गनगरी ः शासनाने राबविलेल्या छत्रपती शिवाजी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही. त्यांना कर्जमाफी मिळावी यासह प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, आंबा-काजू बागायतदारांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच उपोषण केले.
राज्य शासनाने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी सन्मान योजना राबविली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ही बाब येथील आंबा, काजू बागायतदार संघटनेने अनेकदा शासनाच्या निर्दशनास आणून दिली. अनेकदा विविध मार्गांनी आंदोलने छेडण्यात आली. परंतु शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
त्यामुळे स्वातंत्र्यदिनी (ता. १५) जिल्ह्यातील बागायतदारांच्या संघटनेने मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. संघटनेचे श्यामसुंदर राय, विठ्ठल माळकर, महेश परब, अर्जुन नाईक, विठ्ठल आरोस्कर, प्रल्हाद राणे, आत्माराम परब, सुभाष भगत यांच्यासह शेकडो आंबा, काजू, सुपारी, कोकम, भात उत्पादक उपोषणास बसले होते.
दरम्यान, शेतकऱ्यांनी छत्रपती सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी मिळावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यादेखील या वेळी शासनाकडे आंदोलनादरम्यान केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.