Crop Competition : राज्यस्तरीय पीक स्पर्धेत कऱ्हाड तालुका अव्वल
कऱ्हाड ः खरीप हंगामातील राज्यस्तरीय पीक स्पर्धेत (Kharif Crop Competition) एकाच तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच यश मिळविले आहे. त्यामुळे कऱ्हाड (जि. सातारा) तालुका हा राज्यात अव्वल ठरला आहे. कृषी विभागाचे (Department Of Agriculture) मार्गदर्शन, शेतकऱ्यांची मेहनत आणि निसर्गाची साथ यामुळे शेतकऱ्यांनी हे यश मिळवले आहे. या निवडीमुळे आत्तापर्यंत शेतात केलेल्या मेहनतीचे, कष्टाचे चीज झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यंदा कऱ्हाड तालुक्यात सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी आणि भात या पिकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांच्यासह कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून चांगली तयार करून घेतली होती.
दरम्यान, पीक स्पर्धेत सोयाबीनमध्ये उंडाळे येथील सुरेश पाटील यांनी ७९ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन घेऊन राज्यात पहिला क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर इंदोली येथील सुहास कदम यांनी ७३ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन घेऊन राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. खरीप ज्वारीमध्ये गमेवाडी-पाठरवाडी येथील तानाजी यादव यांनी ४६.२८ क्विंटल उत्पादन घेऊन राज्यात पहिला, तेथीलच पांडुरंग यादव यांनी हेक्टरी ४१.५०६ क्विंटल उत्पादन घेऊन राज्यात दुसरा, तर तेथीलच संदीप यादव यांनी हेक्टरी ३९.५७१ क्विंटल उत्पादन घेऊन राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. भुईमूग पिकात इंदोली येथील शंकर कदम यांनी हेक्टरी ४९.३६० क्विंटल उत्पादन घेऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.