
बाळासाहेब पाटील
Mumbai News : शिवसेनेतील फुटीनंतर अगदी एक वर्ष होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांचे बहुप्रतिक्षित मंत्रिपद, विरोधी पक्षनेत्याचा तिढा, विधानपरिषदेच्या उपसभापतींनी विधीमंडळात केलेला जाहीर प्रवेश, ‘राष्ट्रवादी’तील फुटीनंतर आमदारांची बैठक व्यवस्था, किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांचा खास भाषेत घेतलेला समाचार आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी असलेली चढाओढ अशा संमिश्र वातावरणात पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गेला.
एकीकडे विरोधकांत फाटाफूट आणि चढाओढ दिसत असताना सत्ताधारी मात्र निरंकुश असल्याचे समोर आले. विधानपरिषदेत पहिले दोन दिवस नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवरून झालेला गोंधळ वगळता दोन्ही सभागृहात विरोधकांची दुबळी बाजू लक्षात घेता उपसभापती आणि विधानसभेत अध्यक्षांनी कामकाज अक्षरश: रेटले.
काँग्रेसमध्ये चढाओढ
राष्ट्रवादीतील फुटींनंतर महाविकास आघाडीला तडे जातात की काय असे वाटत असताना काँग्रेसने संयमाची भूमिका घेतली आहे. अधिकृत विरोधी पक्षनेतेपद नसले तरी कॉंग्रेस पहिल्यांदाच आक्रमक झालेली पहायला मिळाली.
बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, अमित देशमुख, विश्वजित कदम यांनी एकजूट दाखवत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेतेपद काहीही करून काँग्रेसलाच मिळणार असल्याने काँग्रेसच्या नेत्यांत चढाओढ आहे.
राष्ट्रवादीतील पेच
राष्ट्रवादीत फूट पडली आहे की नाही याचा गोंधळ अद्याप कायम नाही. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार सत्ताधारी बाकावर बसतील अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप काहीच चित्र स्पष्ट नसल्याने पहिल्या दिवसापासून आठवडाभर २७ हून अधिक आमदार अनुपस्थित आहेत. हे आमदार विधीमंडळात आले तरी सभागृहात नाहीत हे विशेष.
निलम गोऱ्हे लक्ष
नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे यांच्या शिवसेनेत विधीमंडळात जाहीर प्रवेश केला. शेकापच्या जयंत पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजप आणि उपसभापती गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत उपसभापतींवर आपला विश्वास नसल्याचे सांगत यावर चर्चेची मागणी केली. मात्र चर्चेनंतर निकाल न देताच कामकाज स्थगित करण्यात आले.
शेती प्रश्नांवर साधकबाधक चर्चा
अधिवेशन सुरू होताच पहिल्या दिवशीच विधानसभेत विरोधकांनी शेतीच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. तेव्हा पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पेरण्या झाल्या नव्हत्या. परिणामी दुबार पेरणीचे संकट होते. मात्र, आठवड्याच्या शेवटात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. तरीही दोन्ही परिस्थितीत विरोधकांनी मदतीची मागणी केली.
बोगस बियाणे, बनावट खते आणि त्याबाबत झालेल्या कारवाया यावरून नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी करण्यात आली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मदतीला धावले आणि कारवाईबाबतची माहिती सभागृहात ठेवली. पहिल्या दिवशीच्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनातच सरकार बोगस खते, बियाण्यांच्या विक्रीप्रकरणी गुन्हे आणि कडक शिक्षेबाबतचा कायदा आणणार असल्याचे जाहीर केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.