
Nagar News : शेवगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे ही पिके जगवण्यासाठी तालुक्यातील पश्चिम भागासाठी मुळा धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेवगाव तालुक्यात यंदा अजूनही पुरेसा पाऊस नाही. शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या अल्प पावसावरच पेरणी केली. कापूस लागवड केली. आता अल्प पावसावर लावलेली खरिपाची कपाशी, बाजरी, मूग, तूर, सोयाबीन ही पिके सध्या सुकू लागली आहेत.
तालुक्याच्या सर्वच भागांत गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ही पिके हातातून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बियाणे व मशागतीवर झालेला खर्च वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा असून पाण्याची आवकही चांगली आहे.
त्यामुळे मुळा पाटबंधारे विभागाने शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव व अमरापूर शाखा कालव्यातून आव्हाणे, ढोरजळगाव, वाघोली, निंबेनांदुर, भातकुडगाव, आखातवाडे, सामनगाव, मळेगाव, लोळेगाव या गावांसाठी प्राधान्याने पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा दयावा.
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी करणारे निवेदन पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहे.
शेतकऱ्यांची गरज ओळखून पाणी सोडावे अन्यथा या भागातील शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी भातकुडगाव फाटा येथे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.