
Buldana News : जिल्ह्यातील चिखली येथील व्यापाऱ्याने कोट्यवधीचा शेतीमाल खरेदी करुन हातवर केले आहेत. अशा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी (ता.१५) रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांची भेट घेत निवेदन दिले.
चिखली पोलिस ठाण्यात संबंधित व्यापारी गाडे बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांना तातडीने अटक करीत कडक कारवाई करू, असे यावेळी आवाड यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
चिखली तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी व्यापारी संतोष गाडे व त्याच्या साथीदारांना शेतीमाल विक्री केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गाडे या ठिकाणी खरेदी-विक्रीचे काम करीत होता. त्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.
आता, मात्र त्याने पैसे आरटीजीएस करतो किंवा काही दिवसांनी देतो, असे सांगत शेतकऱ्यांचे चुकारे थकविले. या संदर्भात शेतकरी तक्रारी करीत आहेत. दरम्यान, शनिवारी शेकडो शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.
‘जरब बसविण्यासाठी कारवाई आवश्यक’
‘‘ग्रामीण भागात व्यापारी शेतकऱ्यांना जादा दराचे आमिष दाखवत उधारीवर खरेदी व्यवहार करतात. यातूनच फसवणुकीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यास आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती गरजेची आहे.
चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यातून इतरांवर जरब बसू शकते,’’ अशी मागणी तुपकर यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.