
1. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या भावात वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १३.६५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४०७ डाॅलरचा चप्पा पार केला होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते. सोयाबीनला आजही देशातील बाजारात प्रतिक्विंटल ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजार पुढील काही काळ स्थिर दिसू शकतो, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत. तुरीची बाजारातील आवक दुसरीकडे दिवसेंदिवस कमी होत आहे. तर तुरीला उठाव चांगला आहे. श्रावणामुळे डाळींना मागणी वाढते. त्यामुळे तुरीच्या भावालाही आधार मिळाला. आज देशातील बाजारात तुरीला सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. यंदा तुरीची लागवड कमी आहे. त्यातच कमी पावसाचा पिकाला फटका बसत आहे. यामुळे तुरीचे भाव पुढील काळातही कायम राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
3. राज्याच्या अनेक बाजारांमध्ये हिरव्या मिरचीची आवक काहीशी वाढलेली दिसते. पण सध्याची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. पिकाला पावसाचा ताण बसत असल्यामुळे आवक अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे हिरव्या मिरचीचे भावही टिकून आहेत. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा भाव मिळतोय. पण काही दिवस बाजारात ही स्थिती कायम दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
4. श्रावण महिन्यामुळे भाजीपाल्याला चांगली मागणी वाढली आहे. तर पावसाच्या खंडामुळे भाजीपाल्याची आवक मर्यादीत होते. वांगी पिकाचेही नुकसान होत असून बाजारात येणाऱ्या मालाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे वांग्याला प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळतोय. वांग्याचे भाव पुढील काळातही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
5. कापूस बाजारात सध्या चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाच्या भावात वाढ दिसली. तर देशातील अनेक जिनिंग मेंटनन्सवर गेल्या आहेत, असे व्यापारी सांगतात. पण राज्यात कापूस खरेदी बंद नाही. तर दुसरीकडे बाजारातील कापूस आवक कमी झाली. शेतकऱ्यांकडे सध्या कापूस असण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे बाजारात कापूस आवक वाढण्याची शक्यता कमी आहे. तर चालू हंगामातील कापूस पिकाला दुष्काळी स्थितीचा फटका बसतोय.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात कापूस पिकाला पावसातील खंडाचा फटका बसतोय. तर उत्तरेत म्हणजेच राजस्थान, पंजाब आणि हरियानातही पिकाचे आधी अतिपाऊस आणि आता पावसातील खंडाचा फटका बसत आहे. त्यामुळे यंदा कापसाचे उत्पादन घटणार हे आतापासूनच स्पष्ट होतंय. तसचं जागतिक पातळीवरील कापूस उत्पादनही यंदा घटणार आहे. त्यामुळं पुढील काळात कापसाचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. सध्या बाजारात कापसाचे भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. भावात काहीसे चढ उतार येतील पण कापसाचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.