
Pune News : गावशिवारातील शेतकऱ्यांपर्यंत जगभरातील शेतीविषयक ज्ञान-तंत्रज्ञान, (Agriculture Technology) संशोधन (Agriculture Research) अखंडितपणे पोहोचविण्याचा व्रत स्वीकारलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन’चा १८ वर्धापन दिन राज्यभर उदंड उत्साहात साजरा झाला. समूह माध्यमात सकाळपासूनच ‘अॅग्रोवन’वर शुभेच्छा संदेशांची बरसात झाली.
यात शेती क्षेत्रातील संस्था, संघटना, कार्यकर्ते, प्रयोगशील शेतकरी, कृषी अधिकारी, निविष्ठा कंपन्यांचे प्रतिनिधी व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘अॅग्रोवन’ने प्रसिद्ध केलेल्या ‘महिला शक्ती विशेषांका’चे राज्यभर जोरदार स्वागत झाले.
देशातील एकमेव कृषी दैनिक असलेल्या ‘अॅग्रोवन’ने गुरुवारी (ता. २०) यशस्वी १८ वर्षं पूर्ण करीत दुसऱ्या तपपूर्तीच्या दिशेने दिमाखदार वाटचाल सुरू केली. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत शेतकऱ्यांसाठी २२ ठिकाणी कृषिजागर मेळावे आयोजित केले. यामध्ये शेतकऱ्यांना विविध पिकांचे नवनवीन संशोधन, तंत्रज्ञान थेट बांधावर दिले गेले.
ज्ञानाची आस लागलेल्या शेतकऱ्यांना या मेळाव्यांमधून विविध शास्त्रज्ञ, संशोधक, कृषी अधिकारी, प्रगतिशील शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले.
गावशिवारातील यशोगाथांपासून ते देशविदेशातील कृषिविषयक घडामोडींची वैविध्यपूर्ण माहिती कष्टकरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणारा अॅग्रोवन आता राज्यातील शेतकरी वर्गाचे एक सामाजिक अंग बनला आहे.
भविष्यातील आधुनिक शेती आणि कृषिकेंद्रित ग्रामविकासाचा वेध घेण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने २० एप्रिल २००५ ला अॅग्रोवनची मुहूर्तमेढ दणक्यात रोवली.
शेतीतले वर्तमानपत्र कसे चालेल, रोज काय प्रकाशित करणार, अशा शंका प्रारंभी घेतल्या जात असताना अवघ्या काही दिवसांतच ‘अॅग्रोवन’ने शेतकऱ्यांचा ग्लोबल शिवाराचा मित्र बनून राज्याच्या कृषी क्षेत्राला चकित केले.
‘अॅग्रोवन’मधील दैनंदिन माहिती, यशोगाथा, प्रयोग, तंत्रज्ञानाच्या टिप्स याच्या बळावर हजारो शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये लक्षणीय बदल घडवून आणले आहेत.
त्यांनी नाना संकटावर मात करीत विविध प्रयोग केले. उत्पादन व उत्पन्नात किती तरी पटींनी वाढ करून दाखवली आहे. दुसऱ्या बाजूला शेती प्रश्नांवरील समस्यांची जंत्री ‘अॅग्रोवन’ने वेळोवेळी बातम्यांमधून सादर केली.
बातम्या, लेख, अग्रलेखातून कधी सकारात्मक पद्धतीने तर कधी आसूड ओढत शासनाला शेती व शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यास भाग पाडण्याचे काम ‘अॅग्रोवन’ने केले आहे.
हा तर महाराष्ट्राच्या मातीचा सोहळा
‘अॅग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यभरातील वाचकांनी हृदयपूर्वक शुभेच्छा दिल्या. अॅग्रोवनचा वर्धापन दिन म्हणजे आमच्यासाठी महाराष्ट्राच्या मातीचा सोहळा असतो, असे विकास आडे यांनी शुभेच्छा देताना म्हटले.
कोल्हापूरच्या तळगदे गावाचे सरपंच संदीप पोळ यांनी अॅग्रोवन म्हणजे शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यातील माहितीचे स्रोत आणि मार्गदर्शक, असे नमूद केले. दौंडमधील शेतकरी उद्योजक रितेश पोपळघट यांनी शेतकऱ्यांचा कैवार घेणारे एकमेव व्यासपीठ म्हणून अॅग्रोवनचा उल्लेख केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.