
Pune News : कृषी विभागाकडून होत असलेल्या पीकस्पर्धांमधील विजेत्या शेतकऱ्यांना वाटण्यासाठी ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दरम्यान, चालू खरिपातील पीकस्पर्धेत सहभागाची अंतिम मुदत येत्या ३१ ऑगस्टपर्यंत राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कृषी व कृषी संलग्न क्षेत्राला राज्यातील शेतकरी प्रयोगशीलतेमधून नवी दिशा देतात. तसेच, अनेक संस्थांदेखील या कार्यात पुढाकार घेतात.
अशा शेतकरी व संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून कृषी पुरस्कार दिले जातात. २०२०, २०२१ व २०२२ मधील पुरस्कारांचे वाटप अद्याप झालेले नाही. परंतु, नोव्हेंबरच्या आत एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वाटप होण्याच्या हालचाली सुरू आहेत.
याच पुरस्कार सोहळ्यात राज्यस्तरीय पीकस्पर्धांच्या विजेत्या शेतकऱ्यांनाही बक्षिसे दिली जातील. पहिले बक्षिस ५० हजारांचे, दुसरे ४० हजारांचे तर तिसरे बक्षिस ३० हजार रुपयांचे असेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धांमधील विजेत्या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बक्षिसे दिली जातात. परंतु, राज्यस्तरीय पीकस्पर्धेतील बक्षिसांसाठी स्वतंत्र कार्यक्रम घेतला जात नाही.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण व इतर पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या शासकीय सोहळ्यातच राज्यस्तरीय पीकस्पर्धेतील बक्षिसे वाटण्याची पद्धत आहे. त्यामुळे राज्यस्तरीय पुरस्कारांप्रमाणेच पीकस्पर्धेतील २०२१ व २०२२ मधील बक्षिसांचेही वाटप अद्याप झालेले नाही.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २०२१ मधील रब्बी हंगामातील राज्य, विभाग व तालुका स्तरावरील पीकस्पर्धांचे निकाल तयार झालेले आहेत. या पुरस्कारांच्या वितरणासाठी एकूण ७२.१७ लाख रुपये मिळावेत, असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनाला पाठविला होता.
तो मंजूर करण्यात आला आहे. पुरस्काराचा निधी खर्च करण्यासाठी राज्य पातळीवर कृषी आयुक्तांना; तर जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला अधिकार देण्यात आले आहेत. तालुका पातळीवर खर्चाचे निर्णय तालुका कृषी अधिकाऱ्याच्या अखत्यारीत होतील.
पीकस्पर्धेत ११ पिकांचा समावेश
राज्यभर होत असलेल्या यंदाच्या खरीप पीकस्पर्धेत शेतकऱ्यांना सहभागाची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नागली, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशा ११ पिकांचे उत्पादक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
जिल्हास्तरावरील स्पर्धेत पहिले बक्षिस दहा हजाराचे, दुसरे सात हजाराचे तर तिसरे बक्षिस पाच हजार रुपयांचे आहे. तसेच, तालुकास्तरावरील पहिले बक्षिस पाच हजाराचे, दुसरे तीन हजाराचे; तर तिसरे बक्षिस दोन हजार रुपयांचे असेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.